ते दिन अजूनही आहेत!
गावातील बालपण, खूप सुंदर होते, ते गाव तेथील नयनरम्य निसर्ग वगैरे आता लोप पावत चालला आहे, ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत असा सूर लोक का लावतात ते मला कळत नाही. आता शहरातील जगण्यात ते दिवस गेले हे मला अजिबात पटत नाही. गावाबद्दल किंवा त्या जुन्या दिवसांबद्दल खूप चांगलं चांगलं लिहिलं जातं पण आपलं सध्याचं जीवन त्याहून सुंदर आहे असं मला मनापासून वाटतं. माझं बालपण फोंडा, पणजी, मडगाव अशा शहरांमध्ये गेलं, आणि ते सुंदर मंतरलेले दिवस अजूनही संपलेले नाहीत. दुपारी शाळेतून घरी आलो कि आमच्या सोसायटीतील मित्रांच्या गराड्यात पत्ते आणि कॅरम खेळत दुपार निघून जायची. संध्याकाळी अर्थातच परत शाळेच्या मैदानावर फुटबॉल रंगायचा आणि रात्र टीव्ही आणि पुस्तकांच्या स्वाधीन असायची. महाभारत, शक्तिमान, जंगलबुक, त्याचबरोबर जीआयजो, ट्रान्सफॉर्मर्स, अशी कार्टून्स, आणि फ्रेंड्स सारख्या अजरामर मालिकांनि आमचं बालपण फुलवल. आज तीच पात्र सिनेमारुपात परत समोर येताना पाहून खूप आनंद होतो. उन्हाळ्याच्या सुटीत मडगावला मावशीकडे जाऊन पु.लं. देशपांडेची बटाट्याची चाळ, विश्वास पाटलांचे पानिपत अशा कादंबऱ्या आणि हार्डी बॉयस, फेमस फ