युद्धविराम
सह्याद्रीच्या रांगांमधील डोंगरमाथ्यावर वसलेल्या त्रीनेत्रगडाच्या तटावर मशाली शांतपणे तेवत होत्या. वारा पडला होता. चांगला अल्ल्हाददायक हिवाळा असूनही गडावरील वातावरण तंग होते. शेषगिरी साम्राज्याचे महाराज नागेंद्रदेव आपल्या मोजक्या मंत्र्यांसाहित विचारविनिमय करण्यात मग्न होते. इतक्यात अचानक आरोळ्या घुमू लागल्या “पकडा, मारा, सोडू नका...” महाराज चमकून खलबतखान्याच्या खिडकीपाशी जाणार तोच खिडकीतून एक बाण येऊन समोर टांगलेल्या त्यांच्या तसबिरीत घुसला. “महाराज, कक्षातून बाहेर पडू नका.” त्यांच्या विश्वासू अंगरक्षक तुकडीचा प्रमुख आपल्या काही माणसांसहित खलबतखान्यात शिरला आणि त्याने रक्षकांना महाराजांभोवती कडे करण्याचा आदेश दिला. “राघव, अरे काय चालले आहे?” त्यांनी अधिकाऱ्यास विचारले. “आपल्याशी धोका झाला आहे महाराज...ते पांढरे मारेकरी...त्यांचा प्रमुख दुसरा तिसरा कोणी नसून....” पुढे तो काही बोलणार इतक्यात एक बाण येऊन सपकन त्याच्या डोक्यात शिरला आणि तो तिथेच कोसळला. महाराजांनी समोर पहिले तर एक पांढरा फेटा बांधलेली आकृती खिडकीतून यायचा प्रयत्न करताना त्यांना दिसली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली